एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर भाजपने आता राहुल नार्वेकरांनाच विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. मुंबई प्रतिनिधी : गेल्या काही द...
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर भाजपने आता राहुल नार्वेकरांनाच विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय.
मुंबई प्रतिनिधी : गेल्या काही दिवसात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यात एक एक पत्ता असा उघडला जातोय, की त्याचा कुणी विचारही करत नसेल. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर भाजपने आता दुसरा डाव टाकलाय तो म्हणजे राहुल नार्वेकरांनाच विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. संख्याबळ असल्याने नार्वेकरच अध्यक्ष होतील यात शंका नाही. पण नार्वेकरांना उमेदवारी देऊन फडणवीसांनी दीर्घकाळ चालणारी खेळी खेळलीय असं म्हणता येईल. याचं कारणही तसंच आहे.
या सरकारमध्ये जणू काही शिवसेनेतून फुटून आलेल्या शिवसैनिकांनाच सर्व काही मिळणार, असं दिसतंय. राहुल नार्वेकर... एके काळी ते आदित्य ठाकरेंचे खास होते. युवा सेनेत काम केलं.. १५ वर्षे कट्टर शिवसैनिक राहिले.. अर्थातच आदित्य ठाकरेंचे खास असल्यामुळे त्यांचा दबदबाही तसाच होता.. पण शिवसेनेने त्यांचा मान राखला नाही आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला..
यात एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेविरोधात बंड करताना जे सांगितलं, तेच २०१४ ला नार्वेकरांनीही सांगितलं होतं. वरिष्ठ नेत्यांपर्यंत म्हणजेच उद्धव ठाकरेंपर्यंत आपल्याला पोहोचू दिलं जात नसल्याचं ते म्हणाले होते.. नार्वेकरांना राष्ट्रवादीने संधी दिली आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक ते मावळ मतदारसंघातून लढले. २०१४ ला मोदी लाट होती, ज्यात मावळच काय, पण अख्ख्या राष्ट्रवादीचाही सुपडासाफ झाला होता.. पुढे काही काळ राष्ट्रवादीत ते फारसे सक्रिय दिसले नाही..
कोण आहेत राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकरांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच केली.
त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत.
१५ वर्षे राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत काम केलं.
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे खास मित्र होते
२०१४ ला राहुल नार्वेकरांनी शिवसेना सोडली
यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला
राष्ट्रवादीकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली
शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा पराभव झाला
२०१९ ला राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला
भाजपने कुलाबा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली
मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या कुलाबा मतदारसंघाचे ते आमदार झाले
फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात
नार्वेकर हे एक वकील सुद्धा आहेत
विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत






कोणत्याही टिप्पण्या नाहीत