राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधून मोठे बळ औरंगाबाद प्रतिनिधी :...
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधून मोठे बळ
औरंगाबाद प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधून मोठे बळ मिळाल्याची चर्चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे विधानसभेवर निवडून गेलेले सहा आमदार आहेत, त्यापैकी पाच आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे; त्याशिवाय मराठवाड्याच्या अन्य जिल्ह्यांतील तीन आमदारदेखील शिंदेना साथ देत असल्याचे वृत्त आहे.
शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या विरोधात सर्वप्रथम बंड पुकारले होते. त्या वेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे वीस आमदार होते. शेवटपर्यंत अठरा आमदार त्यांच्यासोबत राहिले. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदार संघाचे कैलास पाटील आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे बबनराव वाघचौरे यांचा समावेश होता. भुजबळ यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात मोठे बंड उभारले आहे, या बंडाची तीव्रतादेखील तेवढीच मोठी असल्याचे मानले जात आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. त्यांनीच या शहराचे नाव संभाजीनगर असे केले. औरंगाबाद शहराने १९८८पासून काही अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेला सत्तेत ठेवले. विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद शहर व जिल्ह्याने शिवसेनेला भक्कम साथ दिली.
२०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असले, तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आठपैकी सहा मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. त्यात सिल्लोडचे अब्दुल सत्तार, पैठणचे संदीपान भुमरे, कन्नडचे उदयसिंह राजपूत, वैजापूरचे प्रा. रमेश बोरनारे, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल आणि औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट यांचा समावेश आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूकदेखील शिवसेनेने जिंकली. विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने मराठवाड्यात देखील चांगले यश मिळवले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत