हिंदू समाज अहिंसक होता नपुसंक कधी झाला हे कळले नाही, असे मत सावरकर अभ्यासक, अभिनेते शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीत मांडले. डोंबिवली प्रतिनिधी...
हिंदू समाज अहिंसक होता नपुसंक कधी झाला हे कळले नाही, असे मत सावरकर अभ्यासक, अभिनेते शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीत मांडले.
डोंबिवली प्रतिनिधी : अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अहिंसेसारखे दुसरे शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म:चे एवढे डोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हेच आम्हाला कळले नाही, असे परखड मत सावरकर अभ्यासक, अभिनेते शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीत मांडले. आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटतं. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचा हा घोर अपमान आहे असेही ते पुढे म्हणाले.
राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते, पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्थान हा हिंदूंचा आहे, यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हवा, तो नसून चालत नाही. पण त्यांचे प्रमाण ठरलेले आहे हे त्या राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी कोणते उपोषण होऊ देत नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही. उपोषण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय ? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य. असे राज्य चालविणारा राजा असावा, असे पोंक्षे म्हणाले.हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घातक आहे. मुस्लिम लांगुलचालन हे अत्यंत घातक आहे. हे दोन मुद्दे जोपर्यंत कॉंग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर कॉंग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही. कॉंग्रेस सरकारने हिंदूत्वापासून सर्वांना दूर केले, परंतु, आता खरे दिवस यायला लागले आहेत, असेही ते म्हणाले.
मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दुर्दैव
मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भांडायची गरजच लागली नाही पाहिजे. न मागता आपोआप मिळायला हवे. महाराष्ट्रात मराठी माणसाला सर्व मिळाले पाहिजे. पण ते होत नाही, कारण आमची इच्छाच नाही, असे सांगतानाच कर्नाटकात कानडी भाषा ही सक्तीची आहे, महाराष्ट्रात मराठी का होऊ शकत नाही?, असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. मराठीला प्राईम टाईम शो देण्याचे कबूल केल्यानंतरच थिएटरला परवानगी मिळते, पण तेवढे शो मिळतात का, हे कोणीच पहात नाही. सगळ्यांचेच एकमेकांबरोबर लागेबांधे आहेत. सर्व पक्षांच्या आज चित्रपट संघटना आहेत, मात्र त्याही काही काम करत नाहीत. चित्रपट महामंडळ आहे. ते ही काम करत नाही. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी काही तरी करायला हवे, असे परखड मत पोंक्षे यांनी व्यक्त केले.
पोंक्षे पुढे म्हणाले, केवळ शो नाही म्हणून चित्रपट निर्मात्याचे किती नुकसान होते. दोन आठवड्यांनी शो मिळून काय फायदा. मराठीत शंभरातले दोन चित्रपट चालतात. त्यात ही अवस्था असेल तर कसे होणार, अशी चिंता देखील त्यानी व्यक्त केली. तसेच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक असलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले.

.webp)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत