राज्य सरकारकडून औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती; तर राऊताची टीका. मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्य...
राज्य सरकारकडून औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती; तर राऊताची टीका.
मुंबई प्रतिनिधी : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरु ठेवलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्यानं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतल्यानं आक्षेप घेतला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयाचं परिक्षण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी सरकार स्थापन केलं होतं. एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतलेले निर्णय बदलण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर करण्यात आलं होतं. तर, नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं परिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला आक्षेप
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं २९ जून रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत नामांतराबाबत मोठे निर्णय घेतले होते. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव घेण्याचं पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळानं निर्णय घेऊ नयेत, असे संकेत असल्याचं म्हटलं होतं. ठाकरे सरकारचे निर्णय आम्हाला पुन्हा घ्यावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणं एकनाथ शिंदे नामांतराच्या निर्णयाचं परिक्षण करणार आहेत.
संजय राऊत यांची टीका
ठाकरे सरकारनं खास करुन औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव केलं. नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. हे तिन्ही निर्णय फिरवले असतील आणि खरं असेल तर हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी भूमिकेतून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं होतं. या निर्णयांना स्थगिती का दिली हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवं कारण एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीच नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली. राजकीय, आर्थिक , बुलेट ट्रेन, आरेचा विषय हे आम्ही समजू शकतो, आम्ही संघर्ष करु पण औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला?, निजाम काळातील उस्मान तुमचा कोण लागतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत